लॉकडाऊनवरून महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ ?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. लॉकडाऊन वाढवल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा माहाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्य सुरु झालं आहे. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे या विषयी बोललेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. आता शरद पवार यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची शक्यता असल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीत राजकीय मतभेत होण्यास सुरवात झाली आहे. आता आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्रा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून आता काही उपनगरांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पण लॉकडाऊन वाढवायचा की काही सवलती द्यायच्या याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही, अशी काँग्रेस नेत्यांची तक्रार होती. 29 जूनला लॉकडाऊन वाढल्याचा सरकारी आदेश आला तेव्हाच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना याची माहिती मिळाली. यामुळे दोन्ही पक्षातील काही नेते नाराज असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला डावलले जात असल्याची भावना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील नेत्यांमध्ये आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने ठाकरेंपुढे ही नाराजी उघड केली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी राज्यात अर्थविकासाच्या दृष्टीने व्यवहार सुरु करण्याच्या विचारात होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांना विश्वासात न घेता राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेत लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढवल्याची माहिती सुत्रांनी दिली.