महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्षे टिकेल : अब्दुल सत्तार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फ्यूज उडाले नाही तर महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्ष टिकेल, अशी मिश्कील टिप्पणी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार केली. सत्तार यांनी आपल्या भाषणात केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. तर दोन महिन्यात सरकार येईल हे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी दिलेले गाजर असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी केंद्रीय राज्य मंत्री जयसिंग गायकवाड आदी उपस्थित होते.

सत्तार यांच्या भाषणानंतर अशोक चव्हाण सत्तार यांच्या कोटीला उत्तर देतील असे वाटत होतं. मात्र अशोक चव्हाण यांनी सत्तार यांच्या नामोल्लेख करणे देखील टाळले. तीनही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे उमेदवार निवडून येईल. राज्यातील कोरोना जाईल पण भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही. तसेच यावेळी बोलताना चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाण्याचा सल्ला दिला. फडणवीस यांचे नांदेडवर खूप प्रेम आहे. नांदेडला येत राहतात ,आश्वासन देत राहतात. फडणवीस यांना चिंता आहे की माझं काय होणार.

भाजपात चर्चा सुरू आहे फडणवीस केंद्रात जाणार आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. फडणवीस केंद्रात गेल्यावर महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील. महाराष्ट्राचे प्रश्‍न केंद्रात सुटत नाहीत फडणवीस दिल्लीत गेले तर जीएसटीचे पैसे मिळतील. धनगरांचा आरक्षण देण्याचं वचन दिले होते, ते पूर्ण होईल, मराठ्यांच आरक्षण मिळेल.त्यामुळे ही निवडणूक आपण जिंकलो तर फडणवीस हे दिल्लीत जातील हे मी तुम्हाला सांगतो. फडणवीसांना दिल्लीत पाठवण्यासाठी सतीश चव्हाण यांना मतदान करण्याचा आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

निवडणुकीत एकोप्याने काम करण्याचा दिला सल्ला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझ्या 30 वर्षाच्या राजकारणात तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवल्याचे पहिल्यांदा पाहतोय. आता वेळ कमी आहे. एकोप्याने काम करण्याचा सल्ला दिला. मराठा आरक्षणावर बोलताना अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षणावरून दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा काम कोणी करू नका. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संघटना पुढे येतात, काही संघटना ओबीसीच्या संदर्भात असे वातावरण निर्माण करतात की त्यांचं आरक्षण कमी होईल. परंतु महाविकास आघाडी कुठलही आरक्षण देत असताना, दुसऱ्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता त्याबद्दल ते निर्णय घेतले पाहिजेत ही आमच्या सगळ्यांचे भूमिका आहे.