स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठीच विरोधकांची भाषणबाजी, चोर कुठले : पंकजा मुंडें

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – कालचे आलेले नेते स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात. चोर कुठले अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील जय भारत शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होत्या. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांवर टीका केली.

पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर विकासाच्या मुद्यावरुन टीका केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की , ‘नांदेड जिल्ह्याला देशातील आणि राज्यातील सर्वोच्च पदे मिळाली. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री होते. शिवाय त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. तर अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. पण नांदेड जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. आजही नरसी येथे पाण्याची समस्या आहे. माझ्याकडे राज्याचं मंत्रीपद असलं तरी मी बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत नाही.

जनता हेच नरेंद्र मोदींचे कुटुंब –

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला आपलं कुटुंब समजून काम करतात. मात्र हे कालचे आलेले नेते स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात. चोर कुठले, यांनी या राज्याला लूटलं, या देशाला लूटलं आणि हे लोकं सांगतात की नरेंद्र मोदी यांना कुटुंब नाही. पण या देशातील गरीब, वंचित, पीडित जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.