यशोमती ठाकूर यांचा ‘महाआघाडी’तील नेत्यांना सूचक इशारा; म्हणाल्या – ‘सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. त्यावरून काँग्रेस पक्षात नाराजी पसरल्याचे बोललं जात होते. याचवेळी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. आघाडीतील काही नेत्यांच्या काही मुलाखती-लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणं टाळावे. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस पुन्हा एकदा दुखावल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहेत. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या टीकेमुळे काँग्रेसने मौन सोडत महाआघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे.