Maharashtra Rains | राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; मान्सूनच्या परतीचा प्रवास
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी साचलेले पाणी अजूनही ओसरले नाही. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र (Maharashtra Rains), कोकण व मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार (Maharashtra Rains) पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीत (ratnagiri) अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहील.
बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढेल. हे कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा व आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता असून पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवस जोरदार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता राहणार असल्याचे हवामान विभागातील सूत्रांनी सांगितले. राजस्थान येथून मॉन्सूनने परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर संपूर्ण उत्तर भारतातून तीनच दिवसांत मॉन्सून परतला आहे. सध्या परतीच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्यामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आदी भागातून मॉन्सून परतेल. परिणामी १२ ऑक्टोबरनंतर राज्यात पावसाचा जोरही कमी होईल असेही हवामान विभागाने सांगितले.