देशात गुन्हेगारीत महाराष्ट्राचा 7 वा क्रमांक, गुन्हयात 19 % वाढ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात महाराष्ट्र गुन्ह्यात सातव्या क्रमांकावर पोहचला असून, गुन्ह्यात 19 टक्यांनी वाढ झाली आहे. तर सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत. स्त्रियांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारीचा लेखाजोखा असणारा देशातील गुन्ह्याचा अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील 2018 गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. या अहवालाचे प्रकाशन सीआयडीचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पश्चिम विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर व पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते आज झाले. यावेळी सीआयडीमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्यात 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 19 टक्यांनी गुन्हे वाढले असून, या वर्षात 57 हजार 412 गुन्हे जास्त दाखल झाले आहेत. भादवी कलमनुसार राज्यात 3 लाख 46 हजार 219 गुन्हे दाखल झाले आहेत. तर विशेष व स्थानिक कायद्यानुसार 1 लाख 69 हजार 383 गुन्हे नोंद झाले आहेत. विशेष म्हणजे गंभीर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस दल हे गुन्हे रोखण्यात अपयशी होत असल्याचे देखील दिसत आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात 2017 च्या तुलनेत 17.97 टक्यांनी वाढ झाली असून, जबरीचोरीच्या गुन्ह्यात 19 टक्यांनी वाढले आहेत. त्यासोबतच स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे 10. 95 टक्के वाढले असून, सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत. तसेच अनुसूचित जातीजमाती या गुन्ह्यात 13 टक्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण 41. 41 असून, हे प्रमाण वाढणे अपेक्षित आहे. गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र त्या तुलनेत ते उघडकीस आण्याचे प्रमाण त्यामानाने वाढत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान यासोबतच आता सायबर गुन्हे देखील वाढत आहेत. त्या गुन्ह्याचा लेखा जोखा या 2018 मध्ये नसल्याचे कळते.

18 हजार व्यक्तींच्या आत्महत्या
राज्यात 2018 मध्ये 17 हजार 972 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस दप्तरी झालेल्या नोंदीवरून दिसत आहे. दररोज वेगवेगळ्या कारणामुळे मेट्रो शहरात आत्महत्या घडत आहेत. नैराश्य, छळ आणि व्यावसायिक नुकसान यासोबतच आजाराला कंटाळून आत्महत्या होण्याचे प्रमाण जास्त आहे.

रस्ते अपघातात 13 हजार व्यक्तींचा मृत्यू
राज्यात वर्षात 13 हजार 863 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात मृत्यू रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. मात्र रस्ते अपघात थांबत नसून यात अनेकांचे जीव जात आहेत.

राज्यात 2018 मध्ये घडलेले गंभीर गुन्ह्यांची संख्या

गुन्हे प्रकार   2017     2018        वाढ   घट

1) खून–      2199        2103      96     घट

2) दरोडा–     643         679     126      वाढ

3) जबरीचोरी 6451       7430   997      वाढ

4) मालमत्तेचे गुन्हे111163 129164  17हजार991  वाढ

5) स्त्रियांवरील अत्याचार 31997  35497     वाढ

6) अनुसूचित जाती   1689    1974    285

7) अनुसूचित जमाती  464  526    62

एकूण- 288879 346291    57412