Coronavirus : राज्यात 24 तासात ‘कोरोना’चे ‘विक्रमी’ 2940 नवे रुग्ण, 63 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 44000 पार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांचा आज नवा उच्चांक गाठला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 2940 नवे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील संकट आणखी गडद झालं आहे. गेल्या 24 तासात कोरोनाने 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत तर 857 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. राज्यातील कोरनाबाधित रुग्णांची संख्या 44 हजार 582 एवढी झाली असून त्यापैकी 30474 रुग्ण अॅक्टिवह आहेत.
Maharashtra COVID-19 tally 44582 after highest daily spike of 2940 cases; death toll reaches 1517
— Press Trust of India (@PTI_News) May 22, 2020
राज्यात कोरोना मृत्यूदर अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 63 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात 37 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे. आज झालेल्या 63 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 28 रुग्ण आहेत. तर 40 ते 59 वयोगटातील 31 रुग्ण, 4 रुग्ण 40 वर्षाखालील होते. 63 पैकी 46 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1517 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. मुंबईत कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये गेल्या 24 तासात 53 नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1478 एवढी झाली आहे. तर धारावीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 57 झाली असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे.