Coronavirus : राज्यात पुन्हा अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 हजाराहून अधिक, दिवसभरात ‘कोरोना’चे 3729 नवीन रुग्ण, 72 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. गुरुवारी (दि.7) दिवसभरात 3 हजार 729 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या एकूण 3 हजार 350 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 18 लाख 56 हजार 109 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.78 टक्के इतके झाले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

 

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 58 हजार 282 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 51 हजार 111 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात कोरोना मृत्यूंचे प्रमाण मध्यंतरी कमी झाले होते. मात्र मागील काही दिवसांपासून मृतांचा आकड्यात वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 72 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 49 हजार 897 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.55 इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 31 लाख 99 हजार 201 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 19 लाख 58 हजार 282 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.84 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 70 हजार 217 होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 824 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.