विद्यार्थ्यांना दिलासा ! 1 ली ते 8 वी च्या विध्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील मुलांना एक दिलासा मिळाला आहे. हा निर्णय राज्यातील शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांशी संवाद साधला. तेव्हा बोलताना गायकवाड म्हणाल्या, करोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षण विभागाने मधल्या काळात ऑनलाइन, ऑफलाइन, यूट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. १ ली ते ४ थीच्या शाळा आपण संपूर्ण वर्षभर सुरु करू शकलो नाही. ५ वी ते ८ वीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या, तर काही ठिकाणी नाही. जेथे शाळा सुरू झाल्या तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाही. असे त्या म्हणाल्या.

पुढे त्यांनी म्हटले, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खरे पाहता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे, मात्र यंदाच्या वर्षी ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.’ असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.