Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 51 हजार 457 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. तसेच दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये देखील घट होताना दिसत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 34 हजार 031 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या 28 हजार 438 इतकी होती. कालच्या तुलनेत आज नव्या रुग्णांची संख्या 5593 ने वाढली आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 51 हजार 457 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 49 लाख 78 हजार 937 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.06 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 594 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 84 हजार 371 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.54 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 4 लाख 01 हजार 695 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 67 हजार 295 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 18 लाख 74 हजार 364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 67 हजार 537 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.15 टक्के आहे. सध्या राज्यात 30 लाख 59 हजार 095 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 23 हजार 828 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.