शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून 10 वी, 12 वी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेला सुरु होणार परीक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. मात्र, त्यावर मात करुन दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, मात्र, काहीशा उशीराने घेतल्या जाणार आहेत. राज्याच्या शालेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख आज (गुरुवार) जाहीर केली आहे.

इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेतली जाणार आहे. तर परीक्षाचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी आज जाहिर केले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार का ? झाल्यातर कधी होणार असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला होता. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही वारंवार विचारणा करण्यात येत होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी आज दोन्ही परीक्षांच्या तारखा जाहिर केल्या आहेत.

कोरोनाचा काळ लक्षात घेता या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहिर करण्यात आलेली नाही. पण परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणं अतिशय कठीण असल्याचे मत यापूर्वीच वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं होत. त्यामुळे या परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागणार असल्याची शक्यता आहे.