Lockdown : कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 92 ST बस आज धुळ्यातून रवाना होणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे राजस्थानमधील कोटा इथे अडकलेल्या महाराष्ट्रातील 1780 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या 92 बस आज (29 एप्रिल) धुळ्यातून रवाना होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी जवळपास 100 बस धुळ्यातून सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज या बस धुळ्यातून रवाना होणार आहेत.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील 1780 विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ते सातत्याने करत होते. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या विद्यार्थ्यांचा विचार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि राज्यस्थान सरकारमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु या विद्यार्थ्यांना कसं परत आणायचं असा प्रश्न होता.

वेळी महाराष्ट्राची लालपरी मदतीला धावून आली. दरम्यान विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटामध्ये शिकायला गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे.