राज्यात ‘या’ 2 दिवसात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचा जोर कायम आहे. पुढचे आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकत्र आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे.जुलै महिना कोरडा गेल्यानंतर पावसाने ऑगस्टमध्ये जोरदार बँटिंग सुरु केली. मागील 15 दिवसांपासून राज्यात 5 जिल्ह्ये वगळले तर इतर ठिकाणी पाऊस पडला आहे.

राज्यात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करु लागली आहेत. पाऊस चांगला झाल्याने साधारणपणे ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश धरणे 100 टक्के भरतात. तर सांगली, कोल्हापूर सारख्या ठिकाणी पूराची परिस्थिती निर्माण होते.मात्र यंदा जुलै महिना कोरडा गेल्याने पुणे-मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार दिसून येत होती.

परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने जोरात बँटिंग सुरु केली आहे. पुणे वेधशाळेचे संशोधक डॉ. कश्यपी यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, दुसऱ्या स्पेलमध्ये विशेषत: कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस पडेल. कृष्णा-भीमा खोऱ्यातील धरणंही आता भरू लागली आहेत. कृष्णा खोऱ्यातील धरणं 75 टक्के तर भिमा खोऱ्यातील धरणं 65 टक्के भरली आहेत. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्टमधील मोठ्या पुराचा धोकाही काही प्रमाणात टळला आहे.

राज्यतील पाऊसमान
– गेल्या 15 दिवसात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस
– नगर, औरंगाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस
– नंदूरबार, अकोला, यवतमाळ, अमरावती, गोंदियात मात्र सरासरी पेक्षा कमी पाऊस
– परंतु 13 ते 17 ऑगस्टपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज