राज्यात आगामी 5 दिवस ‘धो-धो’, ‘या’ भागांसाठी हवामान खात्याचा ‘इशारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. अशातच 15 ऑगस्टला म्हणजेच वीकेंडला राज्यात आसमानी संकट असेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढील पाच दिवसांत कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकत्र आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडीही कोसळू शकतात. अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. राज्यात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे.

राज्याच्या तुलनेत पुण्यात पाच टक्के कमी पाऊस झाला आहे. जुलै महिना कोरडा गेल्यानंतर पावसाने ऑगस्टमध्ये जोरदार बँटिंग सुरु केली. मागील 15 दिवसांपासून राज्यात 5 जिल्ह्ये वगळले तर इतर ठिकाणी पाऊस पडला आहे. राज्यात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करु लागली आहेत.

पाऊस चांगला झाल्याने साधारणपणे ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश धरणे 100 टक्के भरतात. तर सांगली, कोल्हापूर सारख्या ठिकाणी पूराची परिस्थिती निर्माण होते.मात्र यंदा जुलै महिना कोरडा गेल्याने पुण-मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार दिसून येत होती. परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने जोरात बँटिंग सुरु केली आहे.