पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. गुरुवारी विदर्भातील अकोला येथे ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातही उष्णतेची लाट वाढली आहे, सोलापूरमध्ये ४२.२ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा तापमान वाढणार आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीशीच्या आत राहील. गुरुवारी साताऱ्यात ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांत कमाल तापमान ४१ अंश आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यातील तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या २४ तासांत ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांत कमाल तापमान ४० आणि किमान २० अंश सेल्सिअस राहील.
सांगली जिल्ह्यात उष्णतेची लाट बरीच वाढली आहे. पुढील २४ तासांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आकाश निरभ्र राहील आणि वाढत्या उष्णतेमुळे पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तापमानात अंशतः घट झाली आहे. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आज आकाश निरभ्र राहील. गेल्या २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढतच आहे, कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहणार आहे.
दरम्यान, वायव्य राजस्थान आणि त्याच्या परिसरात समुद्रसपाटीपासून १.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तेथून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू पासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली पूरक असल्याने, राज्यात अंशतः ढगाळ आकाश असून, पावसासाठी अनुकूल हवामान आहे.