मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Weather Update | राज्यात उष्णतेची लाट सुरूच आहे आणि कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा आणि पुणे या तीन जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने उर्वरित जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः निरभ्र राहण्याची आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली आहे.
गेल्या २४ तासांत सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे. सोलापूरमध्ये कमाल तापमान ४१.५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २८.२ अंश सेल्सिअस होते. हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी सोलापूरमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात आकाश निरभ्र राहील आणि जिल्ह्यातील कमाल तापमान ४२ अंश आणि किमान तापमान २८ अंशांवर राहील.
सातारा जिल्ह्यातील पारा किंचित वाढत असून कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत साताऱ्यातील पारा ४० अंशांवर होता. तसेच, भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील २४ तासांसाठी सातारा जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे, पुढील २४ तासांत पुण्यातील पारा ४१ अंशांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. पुण्यातील आकाश बहुतांशी निरभ्र राहील. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यासाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
कोल्हापुरात पारा ३८.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे आणि पुढील २४ तासांत कोल्हापुरात तापमानात थोडीशी वाढ होईल. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.
सांगली जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्र लाट सुरूच आहे. तापमानात थोडीशी घट झाली आहे. पुढील २४ तासांत पारा किंचित वाढून कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सांगली जिल्ह्यात आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील.