सत्तेच्या हव्यासापोटी मोदी सरकार महाराष्ट्रातील किती लोकांचा बळी घेणार आहे?, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइनः रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकारने महाराष्ट्राला इंजेक्शनचा पुरवठा करू नये असे आदेश दिले आहेत. तसेच जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषध पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी दिल्याची माहिती ठाकरे सरकारला मिळाली आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मोदी सरकारचा हा कारनामा अत्यंत क्रूर आणि भयंकर असून हे पाऊल मानवतेला काळीमा फासणारे असल्याचे म्हटले आहे. तसेच सत्तेच्या हव्यासापोटी मोदी सरकार महाराष्ट्रातील किती लोकांचा बळी घेणार आहे? असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

 

याबाबत सावंत म्हणाले की, कोरोनाच्या संकटाचा मोदी सरकार राजकीय संधी म्हणून वापर करत आहे. या संकटात केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून एकत्रितपणे मुकाबला करणे अपेक्षित आहे. मात्र मोदी सरकार मात्र ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राला वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वेळेवर व पुरेशा केला जात नाही. तसेच लस आणि ऑक्सीजनच्या पुरवठ्यातही महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनही मिळू नये याकरता केंद्र सरकार रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांचे हात पिरगाळत असेल तर यापेक्षा अमानवीय कोणतेही सरकार असू शकत नाही. महाराष्ट्र काँग्रेस याचा जाहीर निषेध करत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पीएमओ कार्यालयाला फोन करून राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची मागणी केली. परंतु त्यांना पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. यातूनच हे आधुनिक हिरो देश जळताना निवडणूक प्रचारात मग्न आहेत अशीच नोंद इतिहास घेईल. केंद्र जर राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा होऊ देणार नसेल तर महाराष्ट्र सरकारने या कंपन्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.