Devendra Fadnavis : ‘ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा साठा जातोय फक्त पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच’

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवरून सत्ताधारी-विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले. ‘ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा जास्तीत जास्त साठा पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच जात आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील लोकांवर अन्याय होत आहे’, असा आरोप त्यांनी केला.

पालघर जिल्ह्यातील कोविड सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पहिल्या लाटेत कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला बाधा होत असे. मात्र, आता संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित होताना दिसत आहे. यावेळच्या लाटेत सर्व वयोगट आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. महाराष्ट्र हा सध्या देशातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या सर्वाधिक आहे. पालघरसारख्या जिल्ह्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या जिल्ह्यात किती रुग्ण, बेड्स आणि आरोग्य सुविधा आहेत, याचा विचार केला जात नाही. पॉवरफुल नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांमध्ये नेत आहेत. मंत्री हे सर्व राज्याचे असतात. त्यामुळे त्यांनी सगळं आमच्याच जिल्ह्यात आलं पाहिजे, अशी मानसिकता ठेऊ नये, असेही ते म्हणाले.

दरम्यान, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वजण लगेच रुग्णालयात जाण्यासाठी धावपळ करतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर ताण वाढला आहे. सध्या लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे. 70 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यांच्यावर मोजके उपचार करुन त्यांना बरे केले जाऊ शकते, असेही फडणवीस म्हणाले.