मुंबई महापालिकेच्या निवडणुका ‘महाविकास’ आघाडी एकत्र लढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या (shivsena) स्थापनेपासून पहिल्यांदाच शिवसैनिकांच्या गर्दीशिवाय यंदाचा दसरा (Dussehra) मेळावा पार पडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे, शिवसेनेसाठीचा आजचा दसरा मेळवा अतिशय महत्त्वाचा आहे. कोरोनाचं संकट नसतं तर आज शिवतीर्थावर महापूर आला असता, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी म्हटलं आहे. दसरा मेळाव्या संदर्भात बोलताना, आगामी महापालिका निवडणुकांवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. (mumbai municipal corporation elections)

आगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात लढल्या जातील. महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे राऊत यांनी म्हटलं आहे. अनेक जणांनी म्हटले होते की, 11 दिवसांत सरकार पडले, गणपतीला सरकारचे विसर्जन होईल, पण आता दसरा आला आहे. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे. आता त्यांच्याच खाली बॉम्ब फुटतील, असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी एकत्र असेल, असे भाकीत त्यांनी यावेळी केले.

राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सीमोल्लंघनाची तयारी केली असून आज ते शिवसेनेचे प्रक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधतील. राज्यात कोरोनाचं संकट असताना शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याने भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली. त्या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. जनाची आणि मनाची कोणी कोणाची काढायची ? विरोधकांची ही टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनाही लागू पडते का ? कारण सरसंघचालकांनी देखील आज मेळावा घेतला. आम्ही त्यांचा आदर करतो, असे राऊत म्हणाले.