अमृता फडणवीसांच्या गाण्यावर महेश टिळेकरांची टीका, म्हणाले – ‘गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  “गायी, म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील; पण हा आवाज सहन होत नाही, असे म्हणत प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश टिळेकर (mahesh-tillekar) यांनी अमृता फडणवीस (amruta-fadnavis) यांच्या गाण्यावर निशाणा साधला आहे. तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन, मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही, असा टोला लगावत टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी हे गाणे गायले असून, त्यांनी हे गाणं राज्यातील प्रत्येक भाऊरायाला समर्पित केले आहे. या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे गाणे पाहून काही नेटक-यांनी आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकरदेखील आहेत.

टिळेकर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते रोखठोकपणे आपली भूमिका मांडतात. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टीका केली आहे. चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही, हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठे संधी मिळत नाही. पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते. गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते, अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ या अशा गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सीरिजसारखी, नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,? त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आणि जर या गायिकेकडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल, यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.

पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या आज अमृताचा घनु..या ओळीतील अमृता हा शब्द लतादीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीतून वाचायलाच योग्य वाटतो. इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा, अशा शब्दांत त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांचे नवे गाणे स्त्रियांना समर्पित केले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचे महत्त्व पटवून दिले आहे. या गाण्याच्या व्हिडिओत अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे. तसेच स्त्रिया कशाप्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आहेत ते दाखवून दिले आहे. स्त्री भ्रूणहत्या होतात, स्त्रियांना नाकारले जाते. त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते. त्यांच्यावर अत्याचार होतात हे सगळं टाळण्याचे आवाहन अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्यातून केले आहे. समाज जागृतीच्यादृष्टीने त्यांनी त्यांचे नवे गाणे समोर आणले आहे.