CBI च्या दबावामुळे तापस पाल यांना हृदयविकाराचा ‘झटका’, मृत्यूसाठी केंद्रसरकार जबाबदार : ममता बॅनर्जी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि बंगाली चित्रपट अभिनेते तापस पाल यांच्या मृत्यूसाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. ममता यांनी सांगितले की, केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी पाल यांच्यावर ‘दबाव’ आणला, त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. टीएमसी चे प्रमुख म्हणाले की तापस पाल यांच्या मृत्यूला केंद्र सरकारचे ‘सुडाचे राजकारण’ जबाबदार आहे.
६१ वर्षीय तापस पाल यांचे मंगळवारी मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. टीएमसीचे माजी खासदार तापस पाल हे रोज वैली चिटफंड घोटाळा प्रकरणातील आरोपी होते. सुमारे एक वर्ष त्यांना तुरूंगात राहावे लागले होते.
बुधवारी कोलकाता येथे त्यांना श्रद्धांजली देताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आरोप लावले. त्या म्हटल्या की तृणमूल काँग्रेसचे सुलतान अहमद यांचा मृत्यू देखील याच कारणामुळे झाला होता. बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, सुलतान अहमद हे २०१७ च्या नरादा टैप्स घोटाळ्यात आरोपी होते. त्यामुळे ते तणावात होते.
रवींद्र सदनात ममता बॅनर्जींनी पत्रकारांना सांगितले की, ‘तापस पाल यांच्यावर केंद्रीय एजन्सींचा तीव्र दबाव होता आणि ते केंद्रात सूड घेण्याच्या राजकारणाचे बळी ठरले. तापस पाल यांचा मृतदेह रवींद्र सदनात ठेवण्यात आला आहे, जेणेकरुन लोक त्यांना श्रद्धांजली वाहू शकतील.