सरकारला खाकी वर्दीच्या आतील माणूस मजबूत करायचायख मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या कुलाबा येथील कार्यालयात आयोजित राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा,असा आदेश देत पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या सुविधांची आवश्यकता असेल त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील असे आश्वसन दिले आहे. ‘आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे,’असेही त्यांनी यावेळी म्हंटले.

‘प्रत्येक नागरिकाला पोलीसांविषयी आदर आणि दरारा वाटावा, अशा पद्धतीचे काम झाले पाहिजे. काही वेळा न्याय मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक पावले टाकत आहेत. पोलीसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात. त्यामुळे पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. पोलीसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्यकालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच ‘मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क राहिले पाहिजे, अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा करावा, अश्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, या बैठकीत व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Visit : Policenama.com