तू दरवाजा उशिरच का उघडला ? असे म्हणत त्याने मित्राचा केला खून

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – केवळ दरवाजा उघडण्यास उशीर केल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. दिनेशकुमार गुप्ता असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामजीत विश्वकर्मा याला अटक केली आहे.

रामजीत आणि दिनेशकुमार हे दोघंही मुंबईत कामाच्या शोधात आले होते. दोघे उल्हासगनरमध्ये रुम भाड्यानं घेऊन रहात होते. काही दिवसांपूर्वी रामजीत रात्री उशीरा घरी आला. दिनेशकुमार खोलीत झोपला होता. दार उघडायला उशीर झाल्यामुळे रामजीत संतापला आणि त्यानं दिनेशकुमारच्या डोक्यात जड वस्तुनं वार केले. यामध्ये दिनेशचा जागीच मृत्यू झाला.

15 फेब्रुवारीला दिनेशकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह शेजारच्या लोकांना दिसला. यावेळी रामजीतही तिथेच होता. रामजीत आणि शेजाऱ्यांना पोलिसांना बोलावून घेतल. बहुतेक तो दरू पिऊन पडला असावा आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असावा असे रामजीतने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मात्र दिनेशकुमारचा मृत्यू डोक्यावर आणि शरिरावर वार केल्यामुळे झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं. या घटनेचा तपास सुरु असताना रामजीत हा परिसरातून पसार झाला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. दिनेशकुमार याने दार उघडायला उशीर केल्यामुळे मी रागाच्या भारात जड वस्तु, उचलून त्याच्या डोक्यात आणि छातीवर वार केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.