कारमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला 2 दिवसांनी

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन –  दोन दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अग्निशमन दलास यश आलं आहे. बुधवारी रात्री नांदगावच्या हिसवळ येथे पुराच्या पाण्यात कार वाहून गेलेली. त्यामध्ये असलेल्या दोन पैकी एकाचा जीव वाचला होता तर दुसरा तरुण वाहून गेला होता. बबलू कौरणी असं या तरुणाचे नाव आहे.

मनमाड, नांदगाव भागात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु असून बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हिसवळ परिसरातील एका ओढ्याला पूर येऊन त्याचे पाणी पुलावरुन वाहू लागले होते. म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक देखील बंद होती. त्याचवेळी एक डंपर वाहत्या पुराच्या पाण्यातून जावू लागल्याचे पाहून त्याच्या पाठीमागे कार चालकाने त्याची गाडी नेली.

पण पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने कार पाण्यात वाहून गेली. अनेक जण कार चालकास गाडी पाण्यात घालू नको, म्हणून सांगत असताना सुद्धा त्याने धाडस करुन कार पाण्यातून घेवून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे धाडस जीवावर बेतले आणि कार वाहून गेली.

कारमध्ये बबलू कौरणी आणि त्याचा मित्र बापू आहेर हे दोघे होते. सुमारे २०० फुटावर जाऊन कार एका झाडाला अडकल्यावर आहेर याला पोहता येत असल्याने, तो बाहेर आला. पण कौरणी हा वाहून गेला. गुरुवारपासून अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत होते. शेवटी शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.