‘मी आत्महत्या करणार होतो, पण..’ : मनोज वाजपेयी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता मनोज वाजपेयीसाठी बिहार ते बॉलिवूड हा प्रवास सोपा नव्हता. इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय येऊन वाजपेयीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. संघर्षाच्या काळात मनात आत्महत्येचाही विचार आला, पण त्यावेळी त्याच्या मित्रांनी फार साथ दिल्याचे त्याने सांगितले आहे.

मी शेतकर्‍याचा मुलगा आहे. बिहारमधल्या एका गावात पाच भावंडांसोबत मी लहानाचा मोठा झालो. एका झोपडीच्या शाळेत मी शिकलो. जेव्हा कधी आम्ही शहरात जायचो तेव्हा थिएटरमध्ये सिनेमा पाहायला नक्की जायचो. मी बच्चन यांचा चाहता होतो आणि मला त्यांच्यासारखं व्हायचे होते. पण स्वप्न पाहण्याची माझी ऐपत नव्हती. अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं. अखेर वयाच्या 17 व्या वर्षी मी दिल्ली युनिव्हर्सिटीत दाखल झालो. तिथे मी नाटकात काम केले. हे माझ्या कुटुंबीयांना माहित नव्हतं. एकेदिवशी वडिलांना पत्र लिहून सांगितले, तेव्हा ते रागावले नव्हते. उलट त्यांनी माझी फी भरण्यासाठी 200 रुपये पाठवले. मी कोणत्याच कामाच्या लायकीचा नाही असे गावातले लोक म्हणायचे. पण त्याकडे मी दुर्लक्ष केले.

एनएसडीमध्ये (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) प्रवेश घेण्यासाठी मी अर्ज केला. पण तीन वेळा माझा अर्ज नाकारला गेला. मी आत्महत्या करणार होतो. मी आत्महत्या करेन की काय म्हणून माझे मित्र माझ्या बाजूलाच झोपायचे. ते मला कधीच एकटे सोडत नव्हते. माझा प्रवेश होईपर्यंत त्यांनी माझी साथ दिली. त्यावर्षी मी एका चहावाल्याच्या दुकानात असताना तिग्मांशू त्याच्या खटारा स्कूटरवर मला शोधत आला. शेखर कपूरने मला ‘बँडिट क्वीन’मध्ये भूमिकेची ऑफर दिली. तेव्हा मी मुंबईत राहायला आलो.