भाजप नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘ठाकरे सरकारच्या वाझे गॅंगने मनसुख हिरेन यांची हत्या केली’

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी भिवंडीत केला आहे. तसेच याच वाझे गॅंगकडून हिरेन कुटुंबियांना धमक्या दिल्या जात असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडीतील कोविड लसीकरण केंद्रांना भेट देण्यासाठी सोमय्या बुधवारी (दि. 17) आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपण नुकतीच हिरेन परिवाराची भेट घेतली असून या भेटी दरम्यान हिरेन कुटुंबिय प्रचंड तणावात असल्याचे दिसले. ठाकरे सरकारच्या वाझे गँगकडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या येत असल्याने त्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी आपण लेखी पत्राद्वारे एनआयए यंत्रणा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने 5 जून 2020 रोजी वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले. यामागे नेमका काय हेतू होता याची देखील चौकशी व्हावी, अशा मागणीचे पत्र एनआयएला दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.