मराठा क्रांती मोर्चा पुणे ते जालना ’संघर्ष यात्रा’ काढणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या दोन दिवसांच्या संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. यात्रेला सुरुवात 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पुष्पहार अर्पण करुन होईल. हि यात्रा शिवाजीनगरमार्गे नगररोड ,वाघोली, शिक्रापूर, अहमदनगर, अमळनेर, बीडमार्गे 5 फेब्रुवारी रोजी जालन्याला पोहचणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलीय.

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी संघर्ष यात्रेची घोषणा केलीय. यावेळी पत्रकार परिषदेला राजेंद्र कोढंरे, रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुंजीर,सचिन आडेकर, नाना निवंगुने ,हानुमंत मोटे,अनिल ताडगे,धनंजय जाधव,मीना जाधव, प्राची दुधाने,दिपाली पाडाळे, किशोर मोरे,यांसह समन्वयक आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असून न्यायालयात त्याला स्थगिती मिळालीय. येत्या 5 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव असा मराठा संघर्ष यात्रा आयोजित केलीय, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगितले आहे.

मराठा मुलांच्या नोकर्‍यांच्या नियुक्त्या प्रलंबित असून मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले आहेत. सारथी बंद पाडलीय, त्यामुळे आपण परत एकवेळ एकजुट दाखविणे आवश्यक आहे. मराठा समाजाची ताकद राज्यकर्त्यांना दाखवावी लागणार आहे. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार राज्यकर्त्यांना नसल्याने आपल्याला विचार करावा लागेल. जालना जिल्ह्यातील साष्ठ पिंपळगावातील मराठ्यांनी जो ठिय्या आंदोलनातून संघर्ष सुरु केलाय, त्यांना पाठिंबा देऊन या लढ्याला बळकटी देण्यासाठी मराठा बांधवांनी या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी केलं आहे.