प्रकाश आंबेडकरांनी दिली कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आरक्षणाचा निर्णय दुर्देवी, पण याला गरीब मराठाही दोषी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण बाबत निकाल देत मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे महाराष्ट्रात नाराजी दिसून येत आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय दुर्दैवी असला तरी या निर्णयाला गरीब मराठा समाजही दोषी आहे. जोवर सुप्रीम कोर्टाचे निर्णय विचार केला जात नाही, तोवर आरक्षण मिळणार नाही, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

मी गरीब मराठ्यांनाही दोषी धरतोय..
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, मी दुर्दैव म्हणेन की, गरीब मराठ्यांवर अन्याय झाला आहे. पूर्ण मराठा समाज हा काही श्रीमंत नाही. त्यांच्यापैकी १० टक्के मराठा समाज श्रीमंत आहे आणि बाकी मराठा समाज गरीब आहे. मात्र, या निर्णयासाठी मी गरीब मराठ्यांनाही दोषी धरतोय. याचं कारण की, अनेक वेळा सांगूनही आणि मांडूनही गरीब मराठ्याच्या विरोधात इथला OBC नाही, आदिवासी नाही, अनुसूचित जातीही नाहीत. गरीब मराठ्यांच्या विरोधात श्रीमंत मराठा आहे. हे अनेकवेळा मी सांगून झालं आहे. मात्र, गरीब मराठा आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना कुठेही दिसत नाही. गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्यांबरोबरच जातो. असे ते म्हणाले.

..तर हे आरक्षण मिळणार नाही
सर्वात मोठा ५० टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे. दुसऱ्या माझ्या अंदाजाने मुख्य निकालपत्रात येईल, तो म्हणजे OBC आयोग सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेला आहे. मी अनेक वेळा म्हणालो आहे की, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाने निर्णय मान्य करून मराठा आरक्षण त्यामध्ये कसं बसावायचं हा विचार केला नाही, तर हे आरक्षण मिळणार नाही, अशी सूचना आंबेडकर यांनी केलीय. त्यावेळेस प्रकाश आबेडकर एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

गरीब मराठा वर्गाने स्वतःची राजकीय ओळख निर्माण करायला हवी..
पुढे आंबेडकर म्हणाले, जो आयोग स्थापन करण्यात आला. हा आयोग केंद्र सरकारशी असणाऱ्या आयोगाशी जुळतोय का? मान्यता करून घेतलीये का? तर अजिबात नाही. जी गोष्ट सुप्रीम कोर्टाने निर्माण केली, तीच गोष्ट इथल्या श्रीमंत मराठ्यांनी मग तो राष्ट्रवादी, काँग्रेसमधील असो वा भाजपावाला. त्यांनीच ही गोष्ट नाकारली. त्यामुळे आज आपल्याला असं दिसतंय की गरीब मराठ्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे. गरीब मराठा जोपर्यंत स्वतःची राजकीय ओळख निर्माण करत नाही. मी श्रीमंत मराठ्यांपेक्षा वेगळा आहे, असं जोपर्यंत तो दाखवत नाही. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत त्यांना संधी होती. पण, गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांसोबत जाणं स्वीकारलं, त्यामुळे आज असं दिसतंय की, गरीब मराठ्याला न्याय कुठेही मिळत नाही. जो श्रीमंत मराठ्यांसोबत जातोय, त्याला वापरलं जातंय आणि दुर्लक्षित केलं जातं आहे. खोटं आश्वासनं दिलं जातं आहे. असे ते म्हणाले.

गरीब मराठा म्हणून ओळख निर्माण करायला हवी..
प्रकाश आबेडकर म्हणाले, गरीब मराठ्यांना आरक्षणाच्या दिशेनं जायचं असेल, तर त्यांनी गरीब मराठा म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. ती ओळख निर्माण होत नाही. तोपर्यंत गरीब मराठा सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे, असं म्हणता येणार नाही. त्याला आधार द्यायचा म्हटलं तर सायमन कमिशनसमोर बाबासाहेबांनी आरक्षणाची मागणी केली होती, त्यात गरीब मराठ्यांचा समावेश केला होता. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब मराठा ही रेषा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ओळख निर्माण करता येणार नाही. श्रीमंत मराठ्यांची ओळख गरीब मराठ्यांची झालेली आहे. अमूक इतक्या शाळा, पतसंस्था, बँका आहेत, हे सगळं सत्ताधारी मराठ्यांकडे आहे, गरीब मराठ्यांकडे काहीही नाही. त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलो आहोत, हे दाखवता आलं पाहिजे तेव्हा आरक्षण मिळेल. असे ते म्हणाले.