पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्य सरकारने मराठा आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजपासून कोल्हापुरातून मुंबई, पुणे या शहरांना होणार दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे.
गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावरसकाळी नऊ वाजल्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार समाजाकडून बोलून दाखविण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली.
बैठकीनंतर बोलताना दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने मोठ्या घटनापीठाकडे जाण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र ती देताना अनपेक्षितपणे नोकरी आणि शिक्षणात कायद्याच्या अमलबजावणीला स्थगिती दिली असून एक संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही सभागृहाच्या विरोधी नेत्यांशी आज यासंदर्भात चर्चा केली. काही दिवसांपूर्वी याचिका करणारे आणि त्यांच्या वकिलांशी चर्चा झाली. जी समिती नेमली आहे ती विविध तज्ञांसोबत चर्चा करत आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.