मराठी भाषा दिन : ‘या’ कारणामुळे २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – आज २७ फेब्रुवारी म्हणजेच जागतिक मराठी भाषा दिन आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस असतो. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे असून ते एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार होते.

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच युनेस्को या जागतिक संस्थेने १९९९ वर्षापासून २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांचे जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत, त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. तसेच त्यांची दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी नाटके खूप गाजली. त्यांच्या नटसम्राट या नाटकाला १९७४ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांच्या वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर अशा काही कादंबर्‍या खूप गाजल्या. कुसुमाग्रज हे १९६४ मधील गोव्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

कुसुमाग्रजांचा परिचय :

२७ फेब्रुवारी १९१२ – पुण्यात येथे जन्म
१९१९- २४ – प्राथमिक शिक्षण – पिंपळगांव बसवंत
१९२४ – २९ – माध्यमिक शिक्षण – नाशिक येथील
१९२९ – बालमृबोधमेवामध्ये लेखन व कविता मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण मुंबई विद्यापीठ
१९३० – हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व रत्नाकर मासिकात कवितांना प्रसिद्धी
१९३२ – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग
१९३३ – धृव मंडळाची स्थापना. नवा मनू मध्ये वृत्तपत्रीय लेखन. जीवन लहरी या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
१९३४ – बी ए परिक्षा उत्तीर्ण (मराठी इंग्रजी)
१९३६ – ३८ – गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश. सती सुलोचना कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका
१९३८ – ४६ – वृत्तपत्र व्यवसाय. साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग इत्यादी. विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित (१९४२)
१९४४ – विवाह. पत्नीचे नाव मनोरमा
१९४६ – वैष्ण, पहिली कादंबरी, दूरचे दिवे पहिले नाटक
१९४६ – ४८ – साप्तहिक स्वदेश संपादन
१९५० – लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन
१९५६ – अध्यक्षपद मुंबई उपनगर साहित्य
१९६४ – अध्यक्षपद ४५ वे मडगाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन
१९६४ – जीवनगंगा नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन
१९६६ – राज्य पुरस्कार ययाति आणि देवयानी या नाटकास
१९६७ – राज्य पुरस्कार वीज म्हणाली धरतीला नाटकास
१९६४ – ६७ पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य
१९७० – अध्यक्षपद, मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूर
१९७१ – नटसम्राट नाटकास राज्य पुरस्कार
१९६२ – ७२ अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय. नाशिक
१९७२ – सौ मनोरमाबाईंचे निधन
१९७४ – नटसम्राट नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार
१९८५ – अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार
१९८६ – डी लिट पुणे विद्यापीठ
१९८७ – अमृत महोत्सव
१९८८ – संगीत नाट्यलखन अकादमी पुरस्कार
१९८८ – ज्ञानपीठ पुरस्कार
१९८९ – जागतिक मराठी परिषद मुंबई अध्यक्ष
१९९१- पद्मभूषण
१९९६ – कुसुमाग्रज तारा १० मार्च
१९९९ – कुसुमाग्रजांचे निधन
२००३ – पोस्टाचे तिकीट प्रकाशन