येथील स्मशानभूमीचे चौकीदार सुभाष गायकवाड यांनी आपली व्दितीय कन्या रोहिणी हिचा मंगल परिणय औरंगाबाद येथील मनोज पवार यांच्याशी घडवून आणला. दोन वर्षापूर्वीच याच ठिकाणी गायकवाड यांनी ज्येष्ठ कन्येचा विवाह केला होता. पुन्हा याच स्मशानभूमीत परतूरकरांना सनई चौघड्याचे सूर ऐकू येत होते. चौकीदार गायकवाड यांनी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांना घरोघरी जावून लग्न पत्रिका देवून आग्रहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे या विवाह सोहळ्यात नातेवाईक व समाजबांधवांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले.
विशेष म्हणजे वऱ्हाडी मंडळीसाठी मृतदेह जाळण्याच्या ओट्याजवळच जेवणाचे टेबल लावण्यात आले होते. या लग्न विधीला उपस्थित राहिलेल्या पाहुणे मंडळींचा गायकवाड यांनी यथायोग्य आहेर देवून सन्मान केला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात एकही जण दारु प्यालेला आढळून आला नाही. मसनजोगी समाजामध्ये लग्नात कोणी दारु पिवून आला तर त्यात जातपंचायत वीस हजारांचा दंड ठोठावते. ही इतरांसाठी आदर्श असलेली बाब अनुकरणीय आहे.