काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे उर्मिला मातोंडकर शिवसेनेत; पक्षाच्या प्रभारींची डोकेदुखी वाढली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी काही थांबायची नाव घेईना. पक्षाची सुरू असलेल्या वाताहतीकडे कोणाचेही लक्ष नसून जो तो आपल्या स्वार्थासाठीच पक्षाचा वापर करून घेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे मुंबई काँग्रेसमधील संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष ठरवण्यासाठी काँग्रेसला मुहूर्त सापडलेला नाही. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील मुंबई दौऱ्यावर आहेत. ते नव्या अध्यक्षासाठी चाचपणी करत असले तरी नेत्यांची आपापसातली भांडणे त्यांच्यासाठीही डोकेदुखी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत ऊर्मिला यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. त्याला कारणही तसेच होते. निवडणुकीत ऊर्मिला यांना देवरा व निरुपम यांच्यातील भांडणाचा फटका बसला. सगळ्या गोष्टी पक्ष नेत्यांना सांगूनही काहीच उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी ‘मातोश्री’चा रस्ता धरला. महाविकास आघाडीच्या रूपाने काँग्रेस सत्तेत असतानाही निरुपम शिवसेनेविरोधात विधाने करत असल्याने नाराजी आहे. ही गोष्ट दिल्लीच्या कानावर घातल्यानंतरही निरुपम यांना बिहारमध्ये स्टार प्रचारक म्हणून पाठवले. आपल्याच सरकारच्या सहकारी पक्षाबद्दल विरोधी भूमिका घेऊनही ज्या व्यक्तीवर कारवाई होत नाही तेथे आपले काय, म्हणूनच मातोंडकर यांनी सेनेचा रस्ता धरल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे प्रभारी पाटील यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला आहे.

मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावरून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीदेखील एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये
ऊर्मिला मातोंडकर यांच्यासारखी आत्मविश्वासू, निडर अभिनेत्री शिवसेनेत जाणे काँग्रेससाठी मोठे नुकसान आहे. शिवसेनेचा फायदा असला तरी काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे.

जगताप, सुरेश शेट्टी अध्यक्षपदाच्या शर्यतीत
मुंबई काँग्रेस अध्यक्षाच्या बदलाविषयी चर्चेला जोर आला आहे. मातोंडकरमुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी घराघरात सहजपणे जाऊ शकणारा मराठी चेहरा काँग्रेसने गमावल्याची टीका होत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी भाई जगताप, नसिम खान, अमरजितसिंह मनहास आणि सुरेश शेट्टी या नावांची चर्चा सुरू आहे. भाई जगताप मराठा आहेत. प्रदेशाध्यक्ष पदही मराठा समाजाकडे आहे. त्यामुळे भाई जगताप यांना दुसरी जबाबदारी द्यावी, असा सूर आहे. मुंबईत शिवसेनेसोबत निवडणूक एकत्र लढवायची आहे. त्यामुळे सगळ्या गटांना सोबत घेऊन जाणारा, शरद पवार यांच्यापासून उद्धव ठाकरेपर्यंत सगळ्या नेत्यांशी थेट बोलू शकणारा, संवाद कौशल्य असणारा नेता अध्यक्षपदी निवडावा असा सूर आहे.

या निकषांचा विचार केला तर सुरेश शेट्टी यांचे नाव आघाडीवर असेल. सुरेश शेट्टी यांचे मुंबईत असणाऱ्या ओळखी, आरोग्यमंत्री म्हणून केलेले काम, शिवाय सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध या जमेच्या बाजू आहेत. मात्र, तेदेखील विधान परिषद पराभूत झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत दिल्लीने कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. मनहास हेदेखील अध्यक्षपदासाठी उत्सुक असले तरी दोन वेळा महापालिका निवडणुकीत व एकदा विधान परिषद पदवीधर मतदारसंघात ते पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्याची शक्यता धूसर आहे.

एकूणच पक्षाचे प्रभारी कोणाचे नाव घेऊन दिल्लीला जातात आणि मुंबईला नवा अध्यक्ष कधी मिळतो, हा सध्या काँग्रेस पुढे महत्त्वाचा प्रश्न आहे.