…तर पंतप्रधानपदासाठी ‘हे’ ३ नेते प्रबळ दावेदार : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानपदाविषयी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील असा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी केला आहे.

पंतप्रधान पदाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमत्री होते. त्यांनी राज्याच्या राजकारणात केलेली कामगिरी पाहूनच त्यांच्या नेतृत्वाखालील NDA ला २०१४ मध्ये लोकांनी बहुमत दिले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे NDA बहुमत मिळवण्यास अपयशी ठरले, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात. ‘

राहुल गांधी पंतप्रधान होतील ही चर्चा निरर्थक –

राहुल गांधी पंतप्रधान होण्याविषयी पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, ‘ मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे राहुल गांधींनीच अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक ठरते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती, ममता आणि नायडू हे पंतप्रधानपदासाठी अधिक योग्य पर्याय आहेत, असं मी कधीही म्हणालो नाही.’

म्हणून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही –

आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या केवळ २२ जागा लढत आहे. या सर्व जागा आम्ही जिंकल्या तरी बहुमताचा आकडा त्यापासून फारच दूर आहे. म्हणून माझ्यासाठी पंतप्रधानपदाचा विचारच तर्कहीन आहे.