सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : बसपाच्या मायावतींनी दिला ठाकरे सरकारला ‘गंभीर’तेचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला. यानंतर बुधवारी बिहारमधून चार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं होते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. यानंतर आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मायावती यांनी ट्विट करत म्हणाल्या की, मूळचा बिहारचा तरुण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन घडामोड समोर येत आहे. त्याच्या वडिलांनी पटणा पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनंतर या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलंय.

आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र किंवा बिहार पोलिसांकडून होण्याऐवजी सीबीआयद्वारे होणं योग्य आहे, असं मायावतींनी सांगितले आहे. तसेच सुशांत राजपूत प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहारच्या काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे असं दिसतंय की त्यांचा खरा हेतू या प्रकरणाच्या आडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा आहे, अशी टीका देखील मायावती यांनी काँग्रेसवर केली आहे. त्याचप्रमाणे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने गंभीरता दाखवावी, असं देखील मायावती यांनी सांगितले आहे.