भाजपकडून ‘दिशाभूल’ करण्यासाठी माध्यमांचा वापर : शशी थरूर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरातील मूळ मुद्दयांवरून लक्ष भरकटवण्यासाठी भाजपकडून भलतेच मुद्दे उपस्थित केले जात आहे . त्यासाठी भाजपकडून माध्यमांचा अस्त्रासारखा वापर केला जात आहे. संसदीय अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास रद्द करणे, समाजमाध्यमांचे उत्तरदायित्व, भारत-चीन संघर्ष, अंतर्गत राजकारणाचे परराष्ट्रनीतीवर उमटणारे पडसादाबद्दल काँगृेसचे शशी थरुर यांनी मोदी सरकारवर टीका केली.

कोरोनामुळे सर्वच खासदारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अतिशय कृत्रिम स्वरूपाच्या वातावरणात अधिवेशन होत आहे. आम्ही अगदी मर्यादित तास, मर्यादित मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी, भेटत आहोत. परस्परांमध्ये अंतर ठेवून वावरण्याची सवय नाही, तरीही ते ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे एकूणच वातावरणात अतिशय कृत्रिमता आहे. दुसरे आव्हान म्हणजे रद्द झालेला प्रश्नोत्तरांचा तास. सामान्य स्थितीत दिवसाची सुरुवात ज्या तासाने होते, ज्या कालावधीत मंत्र्यांना उत्तर द्यायला खर्‍या अर्थाने भाग पाडता येते, तो तासच न होणे हे मोठे नुकसान आहे.

आजही आमच्या प्रश्नांची लिखित स्वरूपात उत्तरे मिळत आहेतच, पण ती सामान्यपणे प्रशासकीय अधिकार्‍यांनी तयार केलेली असतात आणि कमीत कमी माहिती मिळेल, अशा भाषेत लिहिलेली असतात. प्रश्नोत्तरांच्या तासाला तुम्ही प्रतिप्रश्न विचारू शकता. विशेषत जेव्हा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, तेव्हा मुद्दा लावून धरता येतो. प्रश्नोत्तरांचा तास हा संसदीय उत्तरदायित्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. व्यवस्थेचे ते एक वैशिष्टय आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरांचा तासच नसणे हा एक मोठा अडथळा असल्याचे थरुर यांनी स्पष्ट केले आहे.