‘मेगा’भरती महागात पडली, आघाडीतील ‘या’ बडया नेत्याचा भाजपवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटला नाही. निकालाला 24 दिवस उलटून गेले मात्र सत्तास्थापनेवरुन सावळा गोंधळ सुरुच आहे. एकीकडे महाशिवआघाडी सत्तास्थापन करेल असा दावा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. परंतू आरोप प्रत्यारोप तर सुरुच आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपकडून करण्यात आलेल्या मेगाभरतीच्या मुद्दयावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती भाजपला महागात पडली असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.

नवाब मलिक म्हणाले की, आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट ठरली आहे. त्यांनतर पुढील दिशा निश्चित होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेत्यांमध्ये उद्या बैठक होईल. तसेच सोनिया गांधी आणि पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एकदा ठरले की सत्ता स्थापन होईल.

नवाब मलिक भाजपने केलेल्या मेगाभरतीवर म्हणाले की भाजपमध्ये असलेले आमदार त्यांच्या मूळ पक्षाचे नाहीत ते सत्तेसाठी त्या पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे सत्ता जाईल तिकडे हे आमदार जाऊ शकतात. तसेच त्यांना पक्षात टिकून ठेवण्यासाठी पुन्हा भाजपचे सरकार येणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. फक्त सत्तेच्या लोभासाठी भाजपने ही मेगाभरती केली होती.

आता मात्र सत्तासमीकरणं बदलले तर मेगाभरती करुन पक्षात घेतलेले आमदार पुन्हा उलट्या दिशेने जातात की काय अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती भाजपला महागात पडली असल्याचे देखील मलिक म्हणाले. म्हणूनच या भीतीने ते आमचे सरकार येणार असून शिवसेनेचे आमदार फुटणार असल्याचे बोलत आहेत असे म्हणत नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

Visit : Policenama.com