पाकिस्तानच्या वनक्षेत्राला भारताच्या या संताचे नाव

श्रीनगर : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारनं तेथील वनक्षेत्राला गुरुनानक यांचं नाव दिलं आहे. तर भारतातल्या सरकारची प्राथमिकता इथल्या प्राचीन शहरांची नावं बदलणं आणि अयोध्येत राम मंदिर बांधणं आहे. अशी टीका मेहबुबा मुफ्तींनी केली आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे कौतुक केले आहे.

‘वेळ कशी बदलते. केंद्र सरकारची प्राथमिकता ऐतिहासिक शहरांची नावं बदलणं आणि राम मंदिर उभारणं यावरून प्रतीत होते. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बालोकी वन क्षेत्राला गुरुनानक यांचं नाव दिलं आणि त्यांच्या नावानं एक विद्यापीठ बनवण्याचा निर्णय घेतला. हे आनंददायक आहे.’ असेही ट्विट केले आहे.

इम्रान खान यांनी एका कार्यक्रमात याची घोषणा केली होती. ‘बालोकी वनक्षेत्र आणि ननकाना साहिब येथे एक विद्यापीठ उभारण्यात येईल आणि याचं नाव बाबा गुरुनानक ठेवण्यात येईल. पाकिस्तान सगळ्या नागरिकांचं आहे आणि गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त सगळ्या भक्तांची यात्रा नीट पार पाडण्याची जबाबदारी आमची आहे’ असं वक्तव्य इम्रान खान यांनी केले .