राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेले गणेश नाईक ‘अडचणीत’, 100 कोटींच्या वसुलीची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेले गणेश नाईक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. एमआयडीसीची 1.34 लाख चौरस मीटर जागा 10 वर्षापेक्षा जास्त बेकायदेशरपणे वापरल्याप्रकरणी बावखळेश्वर मंदिर ट्रस्टला नोटीस पाठवण्याचे आदेश न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने देले होते. यानंतर एमआयडीसीने सरकारी जमिनीचा बेकायदेशीर वापर केल्याबद्दल 100 कोटींच्या वसुलीची नोटीस लवकरच देणार असल्याचे सुनावणीच्यावेळी एमआयडीसीने न्यायालयात स्पष्ट केले.

नवी मुंबईतील महापे येथील ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रियल एरियामधील एमआयडीसीची कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर अतिक्रमण करुन बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. त्यात बावखळेश्वरच्या भव्य मंदिराचाही समावेश होता. यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 2013 मध्ये एका जनहित याचिकेत दिले होते. त्यानंतर गणेश नाईक यांचा वरदहस्त असलेल्या बावखळेश्वर मंदिर ट्रस्टने हे मंदिर वाचवण्यासाठी राज्य सरकारबरोबरच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केले होते. हे बेकायदा मंदिर पोलीस संरक्षण घेऊन तोडा, असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारी 2018 रोजी पुन्हा दिला. मात्र, ट्र्स्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळल्याने ट्रस्टचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये हे बेकायदेशीर मंदिर जमिनदोस्त करण्यात आले.

काय आहे प्रकरण ?
गणेश नाईक यांचे नातेवाईक असलेले संतोष तांडेल हे बावखळेश्वर मंदिराचे ट्रस्टी असून 2009 पूर्वी पावणे येथील एमआयडीसीच्या जागेवर ट्रस्टच्या वतीने बावखळेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली होती. हे मंदिर बेकायदेशीर असल्याने ते जमीनदोस्त करावे अशी मागणी करत संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेऊन बेकायदा मंदिर जमिनदोस्त करण्याचे आदेश दिले.

Visit : Policenama.com