‘… नाहीतर मुख्यमंत्र्यांना दुग्धाभिषेक घालू’

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून, दुधाला १० रुपये प्रति लिटर अनुदान द्या अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास ‘मातोश्री’वर जावून मुख्यमंत्र्यांना दुग्धाभिषेक घालू, अशा इशारा पूजा मोरे यांनी दिला.

साताऱ्यात चालकाला दुधाचा अभिषेक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात कराडनजीक असलेल्या वाठार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर अडवून चालकाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. यासंदर्भात कराड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून, सातारा जिल्ह्यात आंदोलनाच्या अनुषंगाने ठिकठिकाणी मुंबई बंगलोर महामार्गवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बुलढाण्यात बैलाला घातली आंघोळ

स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी बैलाला दुधाची आंघोळ घालून आंदोलन केलं. सरकारने दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान, दूध पावडरला प्रति किलोला ५० रुपये अनुदान आणि तूप, दूध पावडर व बटरवरील जीएसटी कमी करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सरकारने राजू शेट्टी यांच्या दूध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल, असा इशारा देखील आंदोलनावेळी सरकारला देण्यात आला.

राजरामबापू दूध संघाचा टँकर फोडला

पहाटेच्या सुमारास पुणे बंगळुरू हायवे वर दुधाचा टँकर फोडला कसबे डिग्रजहून मुंबईकडे जाणाऱ्या राजारामबापू दूध संघाचा टँकरही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडला. दुधाला योग्य दर मिळण्यासाठी हे आंदोलन आजपासून सुरु झाले आहे. यात विशेष असं की, पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची ठिणगी मोठ्या प्रमाणात पडलेली पाहायला मिळत आहे.

दौंडमध्ये कार्यकर्त्यास दुग्ध अभिषेक

दौंड तालुक्यातील देवळगाव येथे सरकारने वाढीव दर द्यावा यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला दुग्ध अभिषेक घालून सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजार मिळाला पाहिजे यासाठी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला.

माळशिरसमध्ये दूध वाहतूक थांबवली

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर आज पहाटे माळशिरस तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकलूज-इंदापूर रोडवर टायर पेटवून पुणे आणि मुंबई कडे जाणारी दूध वाहतूक रोखली आहे. तालुक्यात दररोज ४ लाख ५० हजार लिटर दुधाचे उत्पादन होते.