माझी अनुपस्थिती ‘राष्ट्रविरोधी’ अन् मुख्यमंत्र्यांची ‘देशभक्ती’ ?, जल्लील यांनी केला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील अनेक वर्षापासून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे मराठवाडा मुक्ती संग्रामाला दांडी मारत असल्याचे दिसत आहे. यावरून शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं वावडं आहे आणि ते स्वत:ला निजामाचे वारसदार समजतात असे म्हणत जलील यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र यंदाच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील अनुपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या अनुपस्थितीवरुन जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

इम्तियाज जलील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केला आहे. जलील म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि मीडिया गप्प का आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे.

जलील यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचरत नाही ?, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो, असेही जलील यांनी म्हटले आहे.

दरवर्षी होतो हा कार्यक्रम

हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी मोठा लढा देण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ, आ.कृ. वाघमारे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी लढा दिला. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ हातात घेत हैदराबाद संस्थान विलीन करुन घेतले. या सशस्त्र कारवाईनंतर अनेक वर्षे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात होता. मात्र, त्याला पुढे शासकीय स्वरुप देण्यात आले. दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण करण्यात येते.