मी तसे म्हणालेच नव्हते ; पंकजा मुंडेचा ‘यू टर्न ‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सोमवारी म्हणाल्या होत्या. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दाखल झाल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
याविषयी पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या की, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.”आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत, पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही’ या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असं वक्तव्य नव्हतं,” असा दावा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे.
पंकजा मुंडेंना रोखलं
धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदचे आमदार रामराव वडकुते यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करताना पंकजा मुंडे यांना रोखलं. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मंत्रालयात प्रवेश करणार नाही असं जाहीर वक्तव्य पंकजा मुंडे यांनी  केलं होतं.
याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आमदार रामराव वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा गेल्या ७० वर्षात जे धनगरांना आरक्षण देऊ शकले नाहीत त्यांना रोखावं. ते ज्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी धनगरांना आरक्षण का दिले नाही. जर मला रोखल्याने धनगर आरक्षण मिळणार असेल तर मला खुशाल रोखा.”
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ? 
मागील अनेक महिन्यांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. यादरम्यानच पंकजा मुंडेंनी नांदेडमध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेत हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी पंकजा गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा मुंडे, आजच्या सभेत तुम्हाला जाहीर वचन देते की, धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणायचं आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, याचा विश्वास असल्याचं पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं होतं. एकीकडे असे वक्तव्य केल्यानंतर आता आज मात्र मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला पंकजा मुंडेंनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याचे दिसून आले.