दलित अत्याचाराबद्दल ‘भाजप’ला दोष देणे चुकीचे : रामदास आठवले

नवी दिल्ली : दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल भाजपला दोष देणं चुकीचं आहे. खरंतर समाजाची मानसिकता अजूनही बदलेली नाही. आजच्या दलितांची राहणीमान बदलेली आहे. तो कुणालाही वाकून नमस्कार करत नाही, याचाच राग सवर्णांच्या मनात असल्यामुळे दलित अत्याचाराच्या घटनांच्या संख्येत वाढ होत आहे, असं मत केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.

दलित अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे, हे रामदास आठवले यांनी नाकारलेलं नाही. मात्र, यामागे सामाजिक भेदभाव आणि मानसिकता कारणीभूत आहे. आठवले यांनी सांगितले की, ‘एका वेळेपर्यंत भाजपला ब्राह्मणांचा पक्ष आहे असं म्हंटले जात होते. मात्र, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेतला तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ज्या संख्येने लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही. भाजपला समाजातल्या सर्वच वर्गातील मतदारांनी मते दिलीत. आता तो दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकाचाही पक्ष आहे,’ असे मत रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

दलित अत्याचाराच्या घटनांत नक्कीच वाढ झाली आहे; पण ती केवळ भाजप सरकारच्या कार्यकाळात नाही तर काँग्रेसचं सरकार असलेल्या राजस्थानात आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. कायदे आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारांचा विषय असला तरी, समाजानेही आपली मानसिकता बदलायला हवी. त्यामुळे भाजपमुळे दलित अत्याचाराच्या घटना घडताहेत, असे म्हणणे योग्य नाही.

‘आरक्षणात आरक्षण’ संदर्भात बोलताना आठवले म्हणाले की, ‘माझा त्याला विरोध नाही. मात्र, ही गोष्ट बोलायला सोपी असली तरी लागू करायला तितकीच कठीण आहे,’ असेही ते म्हणाले. कोणत्याही आरक्षित वर्गात येणाऱ्या जातीतील लोकसंख्या आणि त्यांचा साक्षरता दर वेगवेगळा पद्धतीचा आहे. माझ्या मते, कोणत्याही आरक्षित वर्गातील ज्या जाती शिक्षणात मागे असतील त्यांच्या शिक्षणावर जोर द्या, नोकरीत ते स्वत:च बरोबरी करतील’, असे मत आठवले यांनी मांडले आहे.

जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे तोपर्यंत देशात आरक्षण व्यवस्था कुणीही नष्ट करू शकत नाही. आम्हाला आरक्षण नको, पण यासाठी पहिल्यांदा देशातून जातिवाद संपायला हवा. देशात जातिवाद आहे तोपर्यंत आरक्षण हीच आमची ताकद आहे, असंही त्यांनी सांगितले.