भारतीय रेल्वेनं तिकिट बुकिंगच्या नियमात केले मोठे बदल, आता ‘इतक्या’ दिवस आधी करू शकता ‘बुकिंग’

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 12 मे पासून धावत असलेल्या 30 स्पेशल ट्रेन आणि 1 जून पासून सुरू होणार्‍या 200 ट्रेनच्या तिकिट बुकिंगमध्ये मोठा बदल केला आहे. रेल्वेने या ट्रेनच्या तिकिट बुकिंगसाठी अगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता 120 दिवस अगोदर तिकिट बुक करता येईल.

यापूर्वी जारी केलेल्या निर्देशानुसार राजधानी विशेष ट्रेन आणि 200 मेल एक्सप्रेस ट्रेनसाठी तिकिट बुकिंग 30 दिवस अगोदर होऊ शकते. मात्र, जेव्हा स्पेशल ट्रेन सुरू केल्या, तेव्हा अगाऊ आरक्षण कालावधी सात दिवसांचाच होता, जो नंतर वाढवून 30 दिवस करण्यात आला होता.

सोबतच भारतीय रेल्वेने या सर्व 230 ट्रेनमध्ये पार्सल आणि सामानाच्या बुकिंगची परवानगी दिली आहे.

भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्यांचे संचालन हळुहळु सुरू करण्याच्या योजनेंतर्गत 12 मे रोजी 15 जोडी एसी ट्रेन सुरू केल्या होत्या. या स्पेशल ट्रेन नवी दिल्लीला डिब्रूगढ़, अगरतला, हावड़ा, पाटणा, बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरु, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावीला कनेक्ट करतात.

याशिवाय रेल्वेने प्रवासी मजूरांसाठी श्रमिक स्पेशल आणि एसी स्पेशल ट्रेननंतर 1 जूनपासून 100 जोडी (अप-डाऊन) नॉन एसी स्पेशल ट्रेन चालवण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे. या ट्रेनसाठी तिकिट बुकिंग 21 मेपासून सुरू झाले आहे.

देशभरात 1.58 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकड्यानुसार देशभरात 158333 लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत, ज्यापैकी 4531 लोकांचा जीव गेला आहे. देशभरात 67691 लोक या महामारीने बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 86110 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त रूग्ण

देशात कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार राज्यात आतापर्यंत 59546 लोकांना हा आजार झाला आहे. महाराष्ट्रात कोविड-19मुळे आतापर्यंत 1982 लोकांचा मृत्यू झाला आहे. 18616 लोक बरे सुद्धा झाले आहेत.