‘आई’ रात्री वारंवार पाणी मागायची, मुलाने गळा आवळून केली ‘हत्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या जगात, जर माणसाला सर्वात जास्त प्रेम कोणत्या व्यक्तीवर असेल तर ती व्यक्ती म्हणजे जन्म देणारी आई. परंतु दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्या आईला ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करण्यामागील कारण म्हणजे त्या मुलाची आई त्याच्याकडे रात्री नेहमी पाणी आणि तंबाखू मागत असे. यास कंटाळून त्याने आपल्या जन्मदात्री आईचीच हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या बदलापूर भागात शनिवारी एका ५० वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. ज्यावेळी महिलेची हत्या केली गेली होती, त्यावेळी तिचा फक्त १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा घरी उपस्थित होता आणि त्याने स्वत: फोन करून आपल्या आईच्या हत्येबद्दल आपल्या वडिलांना माहिती दिली.

पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोहोचले असता मृत महिलेच्या अल्पवयीन मुलाने पोलीसांना सांगितले की, घटनेच्या वेळी तो झोपला होता आणि त्याला हत्येचा पत्ता लागला नाही असे सांगून त्याने पोलीसांची दिशाभूल केली. महिलेच्या हत्येपूर्वी घरात कोणत्या प्रकारचा दरोडा वगैरे पडला असल्याची चिन्हे देखील नव्हती. तयामुळे पोलीसांना त्या अल्पवयीन मुलावर शंका येऊ लागल्याने अधिकाऱ्यांनी त्याची काटेकोरपणे विचारपूस सुरू केली, त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलगा तुटला आणि त्याने स्वतःच्या आईला ठार मारल्याचे कबूल केले.

जेव्हा पोलीसांनी त्याला हत्येमागचे कारण विचारले तर मुलाने सांगितलेलं कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याने सांगितले की त्याची आई रोज रात्री वारंवार त्याला पाणी आणि तंबाखूसाठी विचारत असे, यामुळे त्याला बर्‍याच वेळा जागे व्हावे लागत होते आणि त्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नव्हती. यातून सुटका करण्यासाठी त्याने आपल्या आईची गळा दाबून हत्या केली.

लहान मुलाच्या वडिलांनी सांगितले की ते लग्नसमारंभात हजेरी लावण्यासाठी गेले होते, तर मोठा मुलगा गार्ड म्हणून काम करतो आणि तोही ड्यूटीवर होता. अल्पवयीन मुलाने फोनवर त्यांना आईच्या हत्येची माहिती दिली. आरोपीच्या वडिलांनी सांगितले की सुमारे महिनाभरापूर्वी त्याला साप चावला होता तेव्हापासून तो खूप चिडचिडा झाला होता.

Visit : Policenama.com