भाजपा खा. साक्षी महाराज यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा संपुष्टात आणावा’

कानपूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप खासदार साक्षी महाराज (bjp-mp-sakshi-maharaj) हे वादग्रस्त विधान करून वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानहून अधिक मुस्लीम भारतात आहेत, त्यामुळे त्यांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा, अशी मागणी करीत वादग्रस्त विधान केले आहे.

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तानची लोकसंख्या 32 कोटी आहे. तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या 20 कोटींपर्यंत पोहचली असून हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्याक दर्जा तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणावा. तसेच मुस्लिमांनी आता स्वतःला हिंदूंचे धाकटे भाऊ समजून चालावे आणि देशात त्यांच्यासोबत रहावे, असे विधान केले आहे. तसेच देशाच्या वाढत्या लोकसंख्येविषयी बोलताना, वाढती लोकसंख्येच्या चाचणीसाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केले जाणार आहे. ज्या व्यक्तीला दोन पेक्षा जास्त मुले आहेत. त्यांना निवडणूक लढवण्यापासून बंदी घालण्यात येणार असल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

तसेच सरकार कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यास तयार आहे. राम मंदिराप्रमाणेच काँग्रेस आणि इतर विरोधी राजकीय पक्षांनी कृषी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायला हवी आणि भोळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावरून त्यांनी निशाणा धरू नये’ असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला आहे.