हिवाळी अधिवेशन : धनगर आरक्षणावरून पडळकरांचे सरकारवर आरोप

मुंबई : विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले़ पहिल्याच दिवशी विरोधकांनी मराठा, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेशात विधान भवनात प्रवेश केला, ढोल वाजवत आंदोलन करत धनगरांच्या आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही असा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी पडळकरांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, सदाभाऊ खोत यांनीही पोलिसांना रोखत गोपीचंद पडळकर यांच्या आंदोलनात सहभाग घेतल़ा़ महाआघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली मात्र, आजपर्यंत धनगरांच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली नाही़ विरोधात असताना महाविकास आघाडीचे नेते हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते, मात्र आता ते नेते गप्प का झाले? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला़.

आमदार पडळकर म्हणाले, धनगरांसाठी मागील भाजप सरकारनं ज्या योजना आणल्या त्यादेखील बंद करण्याचा घाट महाविकास आघाडी सरकार करतंय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींना देण्यात आलेल्या सुविधा धनगरांनाही लागू केल्या होत्या, त्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली त्यातील एक रूपयाही या महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही़ हा वेष आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे, या अस्तित्वाशी खेळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतंय.

राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याला कारखाना, सूत गिरणी, शिक्षण संस्था, दूध संघ दिले आहेत आणि ज्यांना यातलं काही मिळालं नाही त्यांना मार्केट कमिटी द्यायचं हे धोरण दोन्ही काँग्रेस राबवतं हा प्रश्न मुळापासून संपवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. संघटना वाढवायच्या आणि त्या पक्षाच्या दावणीला बांधायच्या, त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी करतं असा आरोपही पडळकर यांनी शेवटी केला़