‘… तर त्यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील’ : नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation) आतापर्यंत 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यांर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर आता यावरून आमदार नितेश राणे (Nitesh Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)सरकारवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “पेंग्विन आणि कंगना रणौत प्रकरणातील वकिलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे ? आता असं वाटतंय की, यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्या वांद्रे पाली हिल येथील घरात सुरू केलेलं मणिकर्णिका फिल्म्सचं (Manikarnika Films) बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी 354 कलमान्वये तिला नोटीस दिली होती. नोटीसीला योग्य उत्तर न मिळत नसल्यानं पालिकेनं कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोंडलं होतं.

यावेळी कंगनाच्या वकिलानं उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितल्याचं निर्दशनास आणून दिलं. यानंतर तोडकाम थांबवण्यात आलं. उच्च न्यायालयानं कंगनाच्या बेकायदेशीर तोडकामास स्टे दिला. या प्रकरणी मुंबई महापालिकेनं कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांन किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती.

उच्च न्यायालयात पालिकेची बाजू मांडण्यासाठी अस्पि चिनॉय यांची वकिल म्हणून नियुक्ती केली आहे. पालिकेनं त्यांना 22 सप्टेंबर रोजी 3 वेळा 7 लाख 50 हजार आणि 7 ऑक्टोबर रोजी 8 वेळा 7 लाख 50 असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये फी म्हणून अदा केल्याची माहिती पालिकेच्या कायदा विभागानं दिली आहे.