मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रवास कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणि त्यासारख्या नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी; मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra @Central_Railway @WesternRly pic.twitter.com/XfSOESnfSx
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 4, 2020
अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती मनसेने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांच्या कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत क्षयरोग, कर्करोग, यकृत, मृत्रपिंड, मेंदू विकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात आहे. सध्या या रुग्णांना उपचारांच्या खर्चासोबत प्रवास खर्चाला देखील तोंड द्यावे लागत आहे. अनेक आजार असे आहेत ज्यांच्या उपचारांसाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो.
सध्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता रुग्णांना खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नाही. या खर्चामुळे अनेक रुग्ण उपचाराविना वंचित राहत आहेत. त्यामुळे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या नातवाईकांना रेल्वेने प्रवासाची मुभा देण्याची गरज आहे. गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिली जावी, अशी मनसेच्या आग्रही मागणीचा राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीने विचार करावा, असे पत्रात म्हटले आहे.