‘नाणार’ प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले – ‘हा प्रकल्प हातातून गमावणे परवडणारे नाही, सर्वांगीण विचार व्हावा’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – स्थानिकांच्या विरोधामुळे कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. मात्र कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर सुमारे 3 लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प हातातून गमावणे कोकण आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याकरिता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या म्हटले आहे की, निसर्गाने कोकणावर सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. कोकण जितका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तितकाच सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे आणि नरोत्तमांची खाण आहे. पण इतक असून देखील कोकणी तरुण विषण्ण मनस्थितीत आहे. त्यांना नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. खर तर पर्यटन कोकणाच भवितव्य बदलू शकते पण तो विचार नीट झाला नाही. एखादा मोठा प्रकल्प येईल, त्याने भविष्य बदलेल असे आशेचे किरण दिसले खरे पण ते प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत, अशीच एक संधी पुन्हा चालून आली आहे.

आपल्या राज्यात, देशात गुंतवणूक यावी याकरिता जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूला गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा ह्यासाठी राज्य सरकारची धडपड सुरु असल्याचे मी वृत्तपत्रात वाचले. शेजारची राज्य महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने रत्नागिरी राजापूर रिफायनरी सारखा सुमारे 3 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारा नसल्याचे ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणे आपल्याला परवडणारे नाही. अन्यथा औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र ही ओळख पुसायला वेळ लागणार नाही. आज कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. अशावेळी राज्य ठामपणे उभे राहण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पाहायला हवे

ह्या प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. येथील जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात ही त्यांची भीती होती. उद्या नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग ह्यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. काही पर्यावरणवाद्यांच्या मनातील ही भावना होती की कोकणाचा निसर्ग नष्ट होईल. त्यामुळेदेखील काही भूमिपुत्र चिंतेत होते. हे प्रश्न, चिंता, शंका रास्त होत्या आणि आहेत. पण आज या सगळ्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. राज्य सरकारने ह्या संदर्भात जर सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. एवढेच नाही, तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू. आपण ह्या माझ्या म्हणण्याचा योग्य तो विचार कराल आणि राज्याच्या दीर्घकालीन हिताचा निर्णय घ्याल अशी मी आशा करतो, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.