‘विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारीच हरतात’ : राज ठाकरेंची भाजपावर बोचरी टीका 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर टीकास्र सोडले आहे.  ‘विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारीच हरतात’ अशा शब्दात राज ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णायावर भाष्य केल्याचं दिसून आले.
राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. शनिवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. तेव्हा त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं तसेच मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदींवरील रागामुळे तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला असे त्यांनी सांगितले तसेच  विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारीच हरतात, असे सांगत लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचे धोरणच भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कॉम्प्यूटर वा मोबाइलवरून होणारी माहितीची देवाण-घेवाण, त्यांत साठवलेली माहिती तपासण्याचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा आणि तिच्या छाननीचा अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी जारी केल्याचे समोर आले. यावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.  मोदींना लोकांच्या घरात घुसून पाहायचं असेल तर पाहावं. लोक त्यांना शिव्या घालतात हे तरी कळेल असे वक्तव्य ठाकरेंनी केले शिवाय आधी लोकांचे पैसे काढले आता घरात घुसून पाहणार का? असा सवालंही त्यांनी उपस्थित केला. जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं सरकारच्या चुकांचं प्रमाण वाढेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी राज ठाकरे यांना, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार का, असा प्रश्नही विचारण्यात आला. यावरही त्यांनी आपली प्रतिक्रया दिली. ते म्हणाले की, “भाजपा आधी पायावर फावडा मारेल, मग कुदळ मारतील, दोन्ही एकाच वेळी मारणार नाही.” असे सांगतानाच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर जानेवारीमध्ये पुन्हा एकदा नाशिक दौरा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या तिजोरीत पैसा नसताना अशा घोषणा का केल्या जातात? असा सवाल उपस्थित करत त्यांनी कांदा उत्पादुकांना दिलेल्या अनुदानावरही टीका केल्याचे पाहायला मिळाले. पैसा नसताना कशाच्या जोरावर कांद्याला अनुदान जाहीर केले, असा प्रश्नही ठाकरे यांनी भाजपाला विचारला.  नाशिक दौऱ्यात नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावरही ते बोलले. ‘या गर्दीवरुन जनतेचा शिवसेना-भाजपवरील विश्वास उडाल्याचं दिसते’ असेही त्यांनी सांगितले.